स्टॅलिनग्राड :मातृभूमीची हाक!




                 "हे तिसरं राईश (जर्मन राज्य) एक हजार वर्षे टिकेल" अशी भविष्यवाणी हिटलरने ४ मे १९४१ ला जर्मन राईशस्टॅग मध्ये केली होती. ज्यू आणि बोल्शेव्हिजम चा नायनाट करून संबंध युरोप एका जर्मन झेंड्याखाली आणायचे दैवी कार्य त्याला करायचे होते. ३१ जानेवारी १९३३ ला सत्ता हाती घेतल्यापासून पराभव किंवा माघार हे शब्द कधी जर्मनीत उच्चारलेच गेले नव्हते. प्रथम धमकी देऊन आणि ती न ऐकल्यास प्रत्यक्ष कृती करून हिटलर ने अनेकांना नमवले होते. ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया, पोलंड, बेल्जीयम, नेदरलँड, नॉर्वे, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, युगोस्लाव्हिया, ग्रीस, आणि कित्येक देश जर्मनीच्या 'Blitzkrieg' पुढे (Lightning Attack) पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले होते. फ्रान्ससारखा देश ज्याने पहिल्या महायुद्धात चार वर्षे खंदकात बसून चिवट प्रतिकाराने आपल्या देशाचा
४ मे १९४१:एक हजार वर्षाच्या राईश ची भविष्यवाणी 
स्वाभिमान राखला होता, तोच फ्रान्स हिटलरच्या तडाख्यात एक महिनाही टिकला नाही. फ्रान्स खिशात टाकलेल्या आत्मविश्वासाने भरलेल्या हिटलरने 'एक हजार वर्षाची' भाषा का बोलू नये? 
         जून १९४१ च्या शेवटच्या आठवड्यात एक जर्मन सैनिक घरी पात्र लिहीत होता 'ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण आलाय, आम्ही रशिया जिंकायला निघालोय. आता हा शेवटचा शत्रू.  लाल सैन्याला संपवायला आम्हाला ३-४ आठवडे लागतील, आणि ठरल्याप्रमाणे मी ऑगस्ट मध्ये सुट्टी टाकून घरी येऊ शकेन.' आणखी एक SS डिव्हिजन चा सैनिक घरी सांगत होता 'आम्हाला जेवढा वेळ फ्रान्स जिंकायला लागला तेवढ्याच वेळात आम्ही रशिया ला नमवू.' २२ जून ला हिटलरच्या आज्ञेप्रमाणे 'Operation Barbarosa' ची सुरुवात झाल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेल्या आणि थोड्या उन्मादाच्या या जर्मन सैनिकांच्या भावना होत्या. हिटलरने दाखवलेल्या स्वप्नावर जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांना उद्याच्या भयंकर दिवसाची कल्पना नव्हती. ३८ लाख जर्मन आणि अक्षराष्ट्रांचे सैनिक ज्यांनी सोविएत सीमा ओलांडल्या होत्या त्यापैकी काहीच लोक परत येणार होते आणि उरलेल्या ३० लाखाहून अधिक सैन्याच्या नशिबाचा फैसला आता हिटलरइतकाच महत्वाकांक्षी, दमनकारी, आणि कदाचित त्याच्याहुनही कणखर असा त्याचाप्रतिस्पर्धी जोसेफ स्टॅलिन करणार होता. 
                   Blitzkrieg बेतोड होता, पश्चिम युरोप च्या तुलनेत मागास असलेल्या रशियाकडे त्याचा इलाज नव्हता. जमिनीवर पँझर रणगाड्यांच्या तुकड्या आकाशात Luftwaffe (एअर फोर्स) च्या Messrshmitt चा मारा म्हणजे एक एक गावावरून गाढवाचा नांगर फिरायचा. गावेच्या गवे माघार घेत आपल्या जीवनावश्यक सामानासह रशियन सेनेबरोबर पूर्वेकडे पळायची. कारण तो एकच पर्याय शिल्लक असायचा. पण जर्मन सैन्याची हालचाल इतकी वेगवान होती कि बऱ्याच वेळा या पळणाऱ्या रशियन्सच्या अगोदर जर्मन सैन्य त्यांची वाट पाहत वेढा घालून बसलेले असायचे मग येणारे हे नागरिक आणि सैन्य आपसूकच जर्मनीच्या तावडीत सापडायचे. मोठमोठी शहरे वेढली गेली लाखो लोकांना वेढा पडला. अशा वेढ्याला रशियात 'Kessal' म्हणतात. व्हायजमा, मिन्स्क, स्मोलेन्स्क, उमान, आणि किव्ह इथल्या Kessals मध्ये अनुक्रमे ३.२ लाख, ३.१ लाख, १ लाख, ६.६ लाख आणि ६.५ लाख इतके लोक सापडले त्यांना जर्मन सेनेने युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले. युद्धकैद्यांना द्यावयाच्या वागणुकीचे जिनेव्हा कन्व्हेन्शन हिटलरने कधीच धुडकावून लावले होते.. त्याच्यामते युद्धात फक्त जिंकणारे आणि हरणारे दोनच गट असतात त्यापैकी हरणार्यांना कोणतेही अधिकार नसतात. या लाखो लोकांचा पुढे एकतर उपासमारीने किंवा बंदुकीच्या गोळीने मृत्यू झाला कारण जर्मनीला खायला फुकटची तोंडं नको होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे रशियन हे 'हीन' वंशाचे असल्यामुळे जर्मनीच्या दृष्टीने त्यांना जगायचं अधिकारच नव्हता. हीनतेमध्ये पहिले ज्यू आणि दुसरे बोल्शेव्हिक हाच नाझी प्रचाराचा मूळ धागा होता. आणि लाखो जर्मन यावर विश्वासहि ठेवत होते. 
                    सोविएत रशियात तीन महत्वाची शहरं होती. उत्तरेला लेनिनग्राड, मध्यावर मॉस्को, आणि दक्षिणेला वोल्गा नदीच्या तीरावर स्टॅलिनग्राड. जर्मन सेनेचा वेगाचं असा होता कि काही महिन्यातच ते या तिन्ही शहरांच्या अगदी जवळ येऊन ठेपले. या तीन शहरांच्या पलीकडेही अथांग रशिया पसरलेला होता, पण तो भूराजकीय दृष्टिकोनातून बिनकामी होता. या तीन शहरं जिंकल्यास ते पूर्ण रशिया जिंकल्यासारखंच होतं. लेनिनग्राड म्हणजे ऐतिहासिक शहर, पूर्वीचे सेंट पिटर्सबर्ग. महान ऑक्टोबर क्रांती नंतर क्रांतीचा प्रणेता व्लादिमिर लेनिन याचे नाव लावणारे. लेनिनग्राड च्या दारात पोचलेल्या जनरल लीब ला हिटलर ने लेनिनग्राडभोवतीचा फास आवळण्याची आज्ञा केली. लेनिनग्राड ला वेढा पडला. लॅडोगा तलावाच्या काठावर वसलेल्या लेनिनग्राडचा २८ लाख लोकसंख्येला जिवंत ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हवाई वाहतूक आणि लॅडोगा तलाव गोठल्यावर त्यातून होणारी वाहतूक, पण फिनलंड जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरल्याने तोही मार्ग संकटात होता. हा वेढा पुढे अडीच वर्षे चालणार होता ज्यात लाखो लोक मरणार होते आणि भूक माणसाला कुठल्या थराला घेऊन जाऊ शकते हे दिसणार होते. पण तरीही रशियन सेनेने चिवट प्रतिकार केला, लीबला लेनिनग्राड जिंकता आले नाही पण तो वेढा सोडून हलला नाही. लेनिनग्राड पडले नाही. ते शेवट्पर्यंत लढले. 
२२ जून १९४१:ऑपरेशन बार्बारोसा 
                   कमांडर इन चीफ ब्राऊचीस, जनरल हाल्डेर आणि स्वतः हिटलर या सर्वानाच लावतात होते कि एक धक्का सरळ मॉस्को वरच दिला कि सोविएत संघ कोसळून पडेल. ऑक्टोबर १९४१ मध्ये जर्मन सैन्य मॉस्को वर हल्ला करायला निघाले. नोव्हेंबर च्या मध्यापर्यंत ते मॉस्को पासून २०-५० किमी च्या पट्ट्यात होते. जर्मन पँझर तुकड्याना थोपवणे अवघड होते. जर्मन आता इतके जवळ होते कि एक शेवटचा हल्ला करून शहरात घुसण्याचा विचार ते करू लागले. तेवढ्यात एका अशा सैनिकाने युद्धात उडी घेतली ज्याने एकेकाळी नेपोलियन बोनापार्टचा बोऱ्या उडवला होता, पहिल्या महायुद्धयत कैसरच्या सैन्याला सळो कि पळो करून सोडले होते., आणि रशियावर हल्ला करण्यापूर्वी हिटलरलाही त्याने आपली दहशत बसवली होती. तो सैनिक म्हणजे रशियन हिवाळा! रशियाच्या कोणत्याच शत्रूने असा हिवाळा अनुभवलेला नसतो आणि अशा वेळी रशियन सैन्य मात्र वायुगतीनं हालचाल करू शकायचं. त्या थंडीत हालचाल करू शकण्याची त्यांना निसर्गानेच देणगी दिलेली, थंडीचा मुकाबला करण्यासाठीचे कपडे जर्मन सैन्याकडे नव्हते, जर्मन टॅंक अडखळू लागले, मशीनगन्स गोठल्या,जखमांतील रक्त गोठू लागले, जखमी जर्मन सैन्य स्वतःला गोळ्या घालून घेऊ लागले, त्यात स्टॅलिन ने आपल्या सैबेरिअन तुकड्या मैदानात उतरवल्या, स्की बटालीयन मैदानात उतरवल्या. शिवाय T-३४ रणगाडेही आले. बर्फातल्या युद्धात लागणारे कपडे आणि तेही विशिष्ट रचनेचे पांढरे शुभ्र त्यामुळे या तुकड्या शोधणे अवघड जाऊ लागले. खराब वातावरणामुळे Luftwaffe ची विमानेही तळ सोडून हालेनात. जर्मन सैन्याला या सर्व बाजूनी होणाऱ्या हल्ल्यापुढे माघारीशिवाय पर्याय राहिला नाही १०० किमी हुन जास्त पश्चिमेकडे आता जर्मन सरकले, आणि मॉस्कोवरील धोका तूर्तास टळला.
                     चार आठवड्यात रशियाला चिरडून सुट्टीला माघारी जर्मनीला येण्याच्या वल्गना आता मागे पडत चालल्या. जनरल हाल्डेर आपल्या डायरीत लिहितो 'सोविएत रशियाकडे २०० डिव्हिजन्स सैन्य आहे असा आमचा अंदाज होता पण आताच आम्ही ३६० डिव्हिजन्स पाहिल्यात. पुढचे काही असेच थंडीबरोबर लढण्यात जाणार होते, हालचाली मंदावणार होत्या. जर्मन सैन्याच्या प्रचंड संख्येवर आणि त्यांच्या जिद्दीवर आता आघाडी टिकली होती. एकदा हिवाळा संपला कि नवी आघाडी उघडायची असा जर्मन प्लॅन होता. युक्रेन नंतर खार्कोव्ह, वोरोनेझ पासून जर्मन सैन्य दक्षिणेला सरकू लागले. हिटलर ने फ्रेडरिक पॉलस ला 6th आर्मी बरोबर दक्षिणेला मार्च करायला सांगितले. जर्मन सैन्यात नवे चैतन्य संचारले होते. हिटलर ने दुहेरी हल्ला करायचे ठरवले हरमन होत च्या नेतृत्वाखाली एक तुकडी दक्षिणेकडे कॉकेशस पर्वतातील तेलाच्या खाणी काबीज करण्यासाठी जाणार होती, आणि दुसरी पॉलस च्या नेतृत्वाखाली  ३ लाख सैन्य ज्यात १३ पायदळाच्या तुकड्या, चार मोटर डिव्हिजन आणि तीन पँझर डिव्हिजन घेऊन स्टॅलिनग्राडला धडक देणार होणार होती. 
हिटलर आणि फ्रेडरिक पॉलस 
                    स्टॅलिनग्राड हे वोल्गा नदीच्या काठावरील एक मोठे औद्योगिक नगर. रशियन शस्त्रास्त्रे आणि अवजड वाहने यांच्या कारखान्यांनी गजबजलेले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नावात स्टॅलिन लावणाऱ्या या शहरावर विजय म्हणजे स्टालिनवर आणि संबंध रशियावर एक मानसिक विजय असणार होता, ज्यामुळे कदाचित लढणाऱ्या रशियाचे धैर्य गळून पडले असते. पण स्टॅलिन हे जाणून होता. या शहरावर ताबा घेतल्याने दक्षिण सोव्हियेतची उत्तरेशी वोल्गा नदीच्या माध्यमातून होणार वाहतूक ठप्प होणार होती आणि त्यामुळे कॉकेशस पर्वतातील तेलावर डोळे झाकून हात मारता येणार होता. पॉलस ला हरमन होथ आणि Luftwaffe चा आधार असणार होता. 
                    २८ जुलै च्या हिटलरच्या आज्ञेप्रमाणे पॉलस पुढे निघाला २५ ऑगस्ट १९४२ ला त्याने स्टॅलिनग्राड ला वेढा टाकला. तीन बाजूनी अक्ष सैन्य आणि एका बाजूला पूर्वेकडे वोल्गा नदी अशा वेढ्यात शहर अडकले. सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात Luftwaffe विमानांनी आपल्या  प्रारंभ केला ४८ तासात १००० टन एवढ्या बॉम्बगोळ्यांचा वर्षाव करून स्टॅलिनग्राड बेचिराख करून टाकले. मातीचे ढीग आणि इमारती आणि कारखाने यांचे सांगाडे एवढेच काय त्या स्टॅलिनग्राड मध्ये दोन दिवसांनी उरले होते. मग स्टॅलिनग्राड कशासाठी लढणार होते? कशासाठी लाखो नागरिक आणि सैन्य आपला जीव गमावणार होते? तर मातृभूमीच्या हाकेसाठी ! स्वाभिमानासाठी ! हरल्यानंतरची मृत्यू अटळ होता तसा तो शरण जाऊनही अटळच होता. 
                    युद्ध आता गळ्याशी आलं होतं. इथे पराभव म्हणजे विनाश हे स्टॅलिनने जाणले होते. स्टॅलिनग्राड च्या दिशेने जेव्हा जर्मन सेनेची आगेकूच चालू झाली तेव्हाच त्याने एक अध्यादेश काढला (ऑर्डर नं २२७) जो इतिहासात 'Not one step back' order म्हणून इतिहासात नोंदला गेलाय. सैन्यच  काय सामान्य नागरिकांनाही माघार घेता येणार नव्हती. जे मेले ते गेले जे जिवंत आहेत त्यांनी स्टॅलिनग्राड लढवायची होते. वोल्गा नदी पार करून पळून जाणारे पकडून NKVD च्या ताब्यात दिले जाणार होते. स्टॅलिनग्राड जिंकणं हा पर्याय तेव्हा नव्हताच स्टॅलिनग्राड लढवणं एवढच काय ते हातात होतं. युद्ध हरल्यानंतरच्या परिणामांची सर्व रशियन जनतेला कल्पना होती कारण आतापर्यंत जर्मन अमलात गेलेल्या पट्ट्यात लाखो स्त्रियांवर बलात्कार आणि लाखो खून झाले होते. तेव्हा सगळेच लढायला सज्ज होते. स्टॅलिनग्राड मध्ये एक वाक्य प्रसिद्ध होतं 'For the defenders of Stalingrad there is no earth on the other side of Volga' म्हणजे ज्यांना स्टॅलिनग्राड लढवायचं आहे आहे त्यांच्यासाठी वोल्गाच्या पलीकडे पृथ्वी संपते. 
ऑगस्ट १९४२: जर्मन Ju 82 चा स्टॅलिनग्राड वरील हल्ला 

                स्टॅलिनग्राड चा मुख्य राजकीय अधिकारी निकिता ख्रुश्चेव्ह ने मेजर जनरल वॅसिली चुकोव्ह ला विचारले 'कॉम्रेड चुकोव्ह तुला कल्पना आहे तुला काय करायचंय याची?" 
"आम्ही स्टॅलिनग्राड लढवू किंवा मरु" चुकोव्ह उत्तरला.   
चुकोव्ह स्टॅलिनग्राड लढवण्यासाठी योग्य माणूस आहे हे ख्रुश्चेव्हने ओळखले. 62nd आर्मी ची धुरा त्याने त्याच्याहाती सोपविली. २०००० सैन्यानिशी चुकोव्ह ने आपल्या जागा घेतल्या. वेळ घालवणे त्याला मान्य नव्हते, तो म्हणायचा 'Time is blood' हजारो
कमांडर 62nd आर्मी : वॅसिली चुकोव्ह 
नागरिक, कारखान्यातील कामगार, स्त्रिया, मुले, वृद्ध सगळेच त्या मातीच्या ढिगाऱ्याखालून, इमारतीच्या सांगाड्यातून काम करत होते. पुढे पँझर तुकड्या त्यामागे मोटर डिव्हिजन आणि त्यामागे प्रचंड पायदळ शहरात घुसू लागले. चुकोव्ह ने आपल्या सैन्याच्या पाच दहा सैनिकांच्या टोळ्या बनवल्या आणि त्या छुपे हल्ले करून शत्रूला बेजार करू लागल्या. पण तीन लाख एवढ्या प्रचंड सेनेच्या रेट्यापुढे किती काळ खिंड लढवणार? चुकोव्ह चे सैन्य पूर्वे कडे हटू लागले. जर्मन सैन्याच्या बळींचा एकदा मोठा होता ऑक्टोबर  १९४२ च्या मध्यापर्यंत हुकोव्ह चे सैन्य दोन पॉकेट्स मध्ये रेटले गेले. ९० टक्के स्टॅलिनग्राड  आता जर्मनीच्या कब्जात आला. 
                   जर्मन सैन्याची परिस्थितीही हलाखीची होती, रसद आणि शस्त्रास्त्र पुरवठा खंडित होऊ लागला. थंडीचा कडाका वाढू लागला, नोव्हेंबर च्या दुसया आठवड्यात तापमान -१८अंश से. वर पोहोचले. वोल्गा नदीतील वाहतूक मात्र आता जर्मनीच्या माऱ्याच्या टप्प्यात अली त्यामुळे हजारो रशियन नागरिक आणि सैन्याच्या उपासमारीची वेळ आली. उघड होणारा सामना आता बंद झाला आणि स्नायपरयुद्धाची सुरुवात झाली. चुकोव्ह च्या सैन्याने एका ट्रॅक्टरच्या फॅक्टरीत आसरा घेतला होता. जर्मन पोझिशन्स बद्दल च्या बातम्या चुकोव्ह च्या सैन्याला लोकांकरवी मिळत होत्या. स्नायपर ने अचूक निशाणा साधून जर्मन्स ना लक्ष्य बनवले जात होते. घरांचे कोपरे, पाण्याचे कारखान्यातील पाईप्स, मोठ्या मशिन्स याचा वापर लपायला आणि हल्ले करायला होऊ लागला. नागरिकहि या सगळ्याचा वापर करू लागले,परिस्थितीने त्यांना यासाठी तयार केले होते. कधीकधी एकाच इमारतीच्या दोन मजल्यावर एकीकडे जर्मन्स तर दुसऱ्या मजल्यावर रशियन्स अशी परिस्थिती असायची. एखाद्याने  फेकलेला ग्रेनेड शत्रू हातात घेऊन माघारी फेकून द्यायचा इथपर्यंत हि लढाई पोचली होती.
वॅसिली झैटसेव: स्टॅलिनग्राडचा हिरो   
शत्रूच्या छातीत धडकी  पँझर मार्च आणि त्यामागे शत्रूला चिरडत जाण्याची सवय असलेल्या जर्मन सेनेला हे युद्ध मानवेना, ते या प्रकाराला संतापाने 'Rattenkrieg' (उंदीर युद्ध ) म्हणायला लागले. वॅसिली झैटसेव, अनातोली चेकॉव्ह हे रशियाचे दोन स्नायपार हिरोज. रशियन प्रचारात या दोघांच्या शौर्याला प्रचंड प्रसिद्धी देण्यातआली. एकट्या  वॅसिली झैटसेव ने २२५ जणांना आपल्या स्नायपर ने टिपले होते. 
                रशियाला आता फक्त एकच धक्का दिला कि तो कोलमडून पडेल याबद्दल हिटलर आणि त्याच्या जनरल्स  चे एकमत होते. Luftwaffe ने ट्रॅक्टर फॅक्टरी वर बॉम्बवर्षाव केला. हजारो बंडखोर शाहिद झाले. पण चुकोव्ह शरण जाईना. पण कितीही चिवट प्रतिकार केला तरी आणखी काही दिवस शहर लढवणे अशक्य ठरणार होते. जनरल झुकॉव्ह आणि जनरल वॅसिलेवस्की यांनी एक गुप्त योजना आखली होती अगदी स्टॅलिनग्राड मध्ये लढणाऱ्या चुकोव्ह ला देखील याची कल्पना नव्हती. रशिया एखादा प्रतिहल्ला करेल अशी कल्पनाच शत्रूने केली नव्हती आणि त्याच बेसावध क्षणी... १९ नोव्हेंबर १९४२ ला स्टॅलिनग्राड च्या दक्षिण आणि वायव्य बाजूने अचानक दोन सेना प्रकट झाल्या आणि स्टॅलिनग्राडपासून पश्चिमेला ५० किमी वरील 'कालच' या गावी २३ नोव्हेंबर एकमेकांना मिळाल्या. स्टॅलिनग्राडच्या दिशेने तोफांची आतषबाजी सुरु झाली आणि ११ लाख एवढा तो प्रचंड सेनासागर ज्यात ८९४ रणगाडे, १३००० तोफा आणि १५०० विमाने होती  स्टॅलिनग्राडला वेढा टाकायला निघाला. प्रथम काही लाख स्टॅलिनग्राडच्या लोकसंख्येला ३ लाख जर्मन सैन्याने वेढा टाकला आणि आता तेच सैन्य एका मोठ्या वेढ्यात अडकले होते. या 'ऑपरेशन युरेनस' ला दोन महिने अगोदरच सुरुवात झाली होती. झुकॉव्ह आणि वॅसिलेवस्की यांनी प्रचंड प्रमाणावर सैनिकभरती केली होती.  आता आकडे स्टॅलिन च्या बाजूने होते त्याने आपला फास आवळायला चालू केला रशियन विमाने स्टॅलिनग्राड वर घिरट्या घालू लागली आणि पत्रके टाकू लागली 'स्टॅलिनग्राड ही तुमची दफनभूमी आहे पण जर पॉलस ने शरणागती पत्करली तर तुम्हाला योग्य ती वागणूक दिली जाईल. 
              हिटलर एक फार मोठी चूक करत होता आणि जी तो यापुढेही करणार होता ती म्हणजे आपल्या मुख्यालयात बसून प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थितीचे नियंत्रण. युद्धभूमीवर लढणाऱ्या सेनाधिकार्यांना हे निर्णय घेता येत नव्हते. अडीच लाख सेनेबरोबर वेढा तोडून पश्चिमेला मागे फिरण्यास संमती पॉलस ने  पॉलस ने हिटलर कडे मागितली. हिटलर ने स्पष्ट नकार दिला हि डावपेचात्मक माघार(Strategic Retreat) होती. हे हिटलर समजू शकला नाही माघार म्हणजे पराभव असे त्याचे सोपे गणित होते. आणि पराभवाचा जर्मन सैन्यावर आणि जनतेवर होणारा नकारात्मक परिणाम तो जाणून होता. नोव्हेंबर १९४२ मध्ये आपल्या सेनाधिकाऱ्यासमोर बोलताना एका सभेत स्टॅलिनग्राड जिंकल्याची घोषणा केली होती.खरंतर Luftwaffe च्या साहाय्याने शहरात अडकलेल्या सर्व जर्मन सैन्याला Airlift करता येत होते. पण गोरिंगने ने हिटलरला सांगितले कि पॉलस ने बिनधास्त लढावे Luftwaffe त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. हिटलरला असे मनाजोगते सल्ले देणारे लोक आवडायचे त्याने गोरिंगचा सल्ला उचलून धरला. 6th आर्मी ला दररोज ३०० टन एवढ्या रसद आणि दारुगोळ्याची गरज होती आणि Luftwaffe ची क्षमता होती दररोज १२० टन. उपासमार अटळ होती पॉलस लढत होता पण रशियन सेना आता स्टॅलिनग्राड च्या वेशीवर पोचली होती. जर्मन सैन्य मनातून खचत चालले होते. 
स्त्रिया आणि मुले सर्वानीच हातात बंदुका घेतल्या होत्या 

                    आशा हरवलेल्या पॉलस च्या सैन्याला एक आशेचा किरण दिसला . डिसेम्बर १९४२ च्या शेवटच्या आठवड्यात हिटलर ने एरिक व्हॉन मॅन्स्टीन या सरसेनापतीला स्टॅलिनग्राड चा वेढा बाहेरून फोडण्यास पाठवले. आपला फ्युरर आपल्याला टाकून देणार नाही अशीच 6th आर्मीतल्या बहुतेकांची समजूत होती. मॅन्स्टीन आपल्या सैन्यासह डॉन नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोचला. स्टॅलिनग्राड पासून ५० किमीवर त्याला रशियन सेनेने कडवी झुंज देऊन अडवून धरले. मॅन्स्टीनने रशियन सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज घेतला आणि आपण कधीच वेढा फोडू शकणार नाही हि गोष्ट हिट्लरकडे काबुल केली आणि 6th आर्मी ची शेवटची आशा देशील मावळली. ते घरी पत्र लिहून आपल्या घरच्यांची विचारपूस करू लागले परत येण्याचा विश्वास आपल्या प्रियजनांना देऊ लागले. ३० जानेवारी १९४३ ला हिटलरने पॉलस ला फिल्ड मार्शल ही पदवी दिली. पॉलस ने शरणागती पत्करू नये म्हणून एका पदाचा हा त्याच्यावर टाकलेला भार होता. कारण कुठल्याही फिल्ड मार्शल ने आजवर शरणागती पत्करली नव्हती. पण जे आजवर झाले नव्हते ते आता होणार होते, हिटलर ने पराभव तरी कधी बघितला होता पण तोही आता होणार होता. ३१ जानेवारी १९४३ ला फिल्ड मार्शल फ्रेडरिक पॉलस ने शरणागती पत्करली. स्टॅलिनग्राड स्टॅलिनने जिंकले.  आणि इथून पुढे प्रत्येक लढाई स्टालिनच जिंकणार होता. दोस्तांचा हा पहिला मोठा विजय होता. चर्चिल चे शब्द वापरायचे तर ''हा शेवट नव्हता, हि शेवटाची सुरुवातही नव्हती  पण हा सुरुवातीचा शेवट नक्की होता''. यापुढे नवी सुरुवात, दोस्तांच्या विजयाची!
जर्मन 6th आर्मीला रशियन सेनेने घातलेला वेढा 

                स्टॅलिनग्राड जिंकण्याची किंमत फार मोठी होती, जेवढे सैन्य ब्रिटन आणि अमेरिकेने पूर्ण दुसऱ्या महायुद्धात गमावले तेवढे सैन्य रशियाने फक्त स्टॅलिनग्राड मध्ये गमावले होते.  दुसऱ्या महायुद्धाचे पारडे फिरवणारी सर्वात मोठी लढाई कोणती? तर 'स्टॅलिनग्राड' हे त्याचे निर्विवाद उत्तर आहे. यानंतर लाल सैन्य हरले नाही. वोरोनेझ,कर्स्क, खार्कोव्ह, कीव्ह, वॉर्सा, ते एप्रिल १९४५ मध्ये बर्लिन पर्यंत ते अडले नाही. Lebensraum म्हणजे LIving Space म्हणून ज्या रशियाकडे तो पाहत होता तोच रशिया, तेच 'हीन वंशाचे बोल्शेव्हिक त्याच्या घरात घुसले आणि एक दोन नव्हे तब्बल ४५ वर्षे त्यांनी त्याच्या मातृभूमीला आपल्या पंजात जखडून ठेवले, हिटलरच्या नाझी महत्वाकांक्षेची किंमत संबंध देशाला मोजावी लागली. हिटलरने पळपुटेपणाचा आत्महत्येचा मार्ग निवडला पण देशाला आत्महत्या करता येत नव्हती त्यांना सहन करावे लागले. आणि १००० वर्षे जे टिकणार होते ते जर्मन राज्य जेमतेम १२ वर्षे टिकले. 
                आज स्टॅलिनग्राड मामयेव टेकडीवर एक भव्य स्मारक उभे आहे. एक स्त्री जिने तलवार उगारली आहे आणि रौद्ररूप धारण केले आणि ती हाक मारते आहे. या स्मारकाचे नाव आहे 'The Motherland Calls' म्हणजे मातृभूमीची हाक. ज्या लाखो लोकांनी प्राणाची बाजी लावून आपल्या मातृभूमीचे रक्षण केलं त्यांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभं आहे. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी २०० पायऱ्या
'मातृभूमीची हाक' अर्थात 'The Motherland Calls' statue: मामायेव हिल, स्टॅलिनग्राड 
आहेत ज्या २०० दिवसांच्या स्टॅलिनग्राड च्या लढाईच्या निदर्शक आहेत. वॅसिली चुकोव्ह, वॅसिली झैटसेव या वीरपुरुषांचं दफन याच टेकडीवर मातृभूमीच्या पायात करण्यात आलेलं आहे. सहा सात वर्षाच्या लहान मुलांपासून वृद्ध स्त्रियांपर्यंत हजारो लोक या युद्धात उतरले, पराभव होत असताना ते आले काही मेले जे जगले ते जिंकून बाहेर पडले, मातृभूमीचा स्वाभिमान त्यांनी टिकवला, त्यासाठी ज्या त्यागाची, निर्धाराची गरज लागते तो त्यांच्याजवळ होता, अशा त्यागाने आणि निर्धारानेच देश महासत्ता बनत असतो, त्याला दुसरा मार्ग नाही.

---रणजीत यादव 



Comments

Popular posts from this blog

गोळवलकर गुरुजी आणि संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन!

Pratisarkar:- A parallel government that threw away the British Raj